---Advertisement---
जळगाव : प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे सरकार कार्यरत झाले असून शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक संदेश जळगाव शहराच्या महापौर दीपमाला कडे यांनी दिला आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी सोमवारी सकाळी अचानक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हजेरी लावली. स्वतः प्रवेशद्वारावर उभे राहून त्यांनी कर्मचाऱ्यांची उपस्थिती तपासली. या अचानक तपासणीमुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.
आयकार्ड सक्तीचे; उशिरा येणाऱ्यांना तंबी
काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याबरोबरच ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करत नसल्याचेही समोर आले होते. आजच्या तपासणीत महापौरांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. जे कर्मचारी विलंबाने आले किंवा ज्यांच्याकडे आयकार्ड नव्हते, त्यांना जागेवरच समज देण्यात आली.
“जनतेची कामे वेळेत व्हावीत, यासाठी कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती अत्यावश्यक आहे. यापुढे शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
अवचक तपासण्या सुरूच राहणार
प्रशासकीय काळात कामकाजात काही प्रमाणात शिथिलता आली होती. मात्र आता थेट मैदानात उतरून कामकाज सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे, असे महापौरांनी सांगितले. पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक तपासण्या केल्या जातील आणि शिस्त न पाळणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
महापौरांच्या या भूमिकेचे जळगावकर नागरिकांकडून स्वागत होत असून, यामुळे महापालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









