श्रद्धांजली वाहावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं; संजय राऊत यांच्याकडून शोक व्यक्त….!

---Advertisement---

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.

“अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी आली तेव्हा मनोमन प्रार्थना करत होतो की ही बातमी खोटी ठरावी आणि ते सुरक्षित असावेत. मात्र त्यांच्या निधनाची बातमी कानावर येताच मोठा धक्का बसला, अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण बेचव व अळणी होईल. दिलखुलास, रोखठोक आणि कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा असा नेता महाराष्ट्राने गमावला आहे.”

संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला

“त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची कार्यपद्धती, प्रशासनावरची पकड आणि अभ्यासपूर्ण निर्णय हे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील. बारामतीशी त्यांचं अतूट नातं होतं आणि त्याच बारामतीत त्यांचा अंत व्हावा, हा एक विचित्र योगायोग आहे,” असंही राऊत म्हणाले.

अभ्यासू, तयारीनिशी कॅबिनेटमध्ये येणारे मंत्री अजित दादा होते…. 

श्रद्धांजली वाहावी लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार उपमुख्यमंत्री होते. कॅबिनेट बैठकीला ते नेहमी पूर्ण तयारीनिशी यायचे. राज्याच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास, विशेषतः पाटबंधारे आणि पाणी विषयातील त्यांचं ज्ञान अतुलनीय होतं, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं. शरद पवार यांनी त्यांना राजकारणात आणलं. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली होती. असा अकाली अंत होईल, याची कुणालाही कल्पना नव्हती.” असं संजय राऊत म्हणाले.

‘सध्या महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत ?’

“अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी मिळालेलं प्रत्येक पद विकासासाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी वापरलं. त्यांच्या बोलण्यात कधी राग असला तरी क्षणात विनोद करून वातावरण हलकं करण्याची त्यांची हातोटी होती,” असं राऊत म्हणाले. “महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत कळत नाही. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे नेते कमी वयात गेले आणि आता अजित पवार,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.

‘अनेकवेळा उपमुख्यमंत्री असलेले अजित दादा उत्तम आणि झाले अकार्यक्षम मुख्यमंत्री झाले असते’

“विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते, तर महाराष्ट्राला एक उत्तम, कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. दुर्दैवाने ते घडू शकलं नाही. महाराष्ट्राला अजून काय पाहावं लागेल, हे सांगता येत नाही,” असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना परिवारातर्फे अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---