---Advertisement---
जळगाव : जिल्हा परिषद, जळगावच्या प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी व सहाय्यक अधिकारी माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागवलेली माहिती वेळेवर आणि पूर्णपणे देत नसल्याचा आरोप करत, ‘भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश’ महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांनी तक्रार केली. या प्रकरणी विभागीय माहिती आयुक्त नाशिक, राज्य मुख्य माहिती आयुक्त मुंबई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करु असा इशारा दिला आहे.
राजेंद्र सपकाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केल्यानुसार, प्राथमिक शिक्षण विभागातील जनमाहिती अधिकारी, उपशिक्षणाधिकारी व आस्थापना विषयक कर्मचारी हे वारंवार अपूर्ण, दिशाभूल करणारी व टाळाटाळ करणारी माहिती पुरवत असून, त्यामुळे माहिती अधिकार कायद्यानुसार नागरिकांना मिळणाऱ्या माहितीपासून ते वंचित राहत आहेत.
---Advertisement---
तसेच, माहिती अधिकार अर्जांवर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केल्यानंतर देखील आदेश न पाळता मुद्देसूद माहिती न देता फक्त कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखवले जात आहे. यामुळे माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचा स्पष्ट भंग होत आहे.
राजेंद्र सपकाळे यांच्या मते, ग्रेडेड मुख्याध्यापक पदोन्नती, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण (वर्ग-३), सेवाज्येष्ठता याद्या, निवड श्रेणी, तसेच आरटीई अंतर्गत २५% प्रवेश प्रतिपूर्ती यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरील माहिती देण्यात विभागातील अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित जनमाहिती अधिकारी व कर्मचारी यांना विहीत मुदतीत, मुद्देनिहाय व स्पष्ट माहिती देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जर माहिती देण्यात आणखी टाळाटाळ झाली, तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला जाईल, असा इशाराही सपकाळे यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे जिल्हा परिषद जळगावच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.