एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांना ब्रेक; तीर्थदर्शन योजनेवर प्रश्नचिन्ह ?

---Advertisement---

 

राज्यातील सत्ताकारणात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत,एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या काही महत्त्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारकडून ब्रेक लावण्यात आल्याची चर्चा सध्या जोरात आहे. यामध्ये “माझी शाळा, आनंददायी शाळा” आणि “आनंदाची शिदोरी” यांसारख्या योजनांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.

विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” पुढे सुरू ठेवली जाणार का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी तीर्थयात्रेसाठी अर्ज केले होते. मात्र सध्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

जालना जिल्ह्यात सर्वाधिक अर्ज
राज्यातील अनेक जिल्ह्यांत अर्ज प्रलंबित असल्याचे चित्र आहे. विशेषतः जालना जिल्ह्यात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. येथे एकूण 5,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी केवळ 929 अर्जांना मंजुरी मिळाली असून सुमारे 4,700 पेक्षा अधिक अर्ज प्रलंबित किंवा छाननीच्या टप्प्यात आहेत. मंजूर लाभार्थ्यांनाही प्रत्यक्ष तीर्थयात्रेसाठी कधी बोलावले जाणार, याबाबत स्पष्टता नाही.
ही योजना शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू झाली होती. सुरुवातीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; मात्र अलीकडच्या काळात मंजुरी प्रक्रियेचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असल्याने या मुद्द्यावर सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. काही राजकीय वर्तुळांत या योजनांना ब्रेक लागण्यामागे अंतर्गत राजकीय मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---