---Advertisement---
Shivsena News : जळगाव : राज्य शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यासाठी आणि वाचाळवीर मंत्र्यांच्या राजीनामेसाठी शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महिला भगिनींच्या व निराधार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी व इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी ११ ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वाढत्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारमधील मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याच्या विरोधात व अनेक लोकोपयोगी योजना बंद केल्याच्या निषेधार्थ तसेच निवडणुकीत राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी आज गुरुवारी (७ ऑगस्ट) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय गोलानी मार्केट येथे जिल्हा पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत तालुकाप्रमुख, तालुका संघटक, युवा सेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, महानगर प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी व विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, दीपक राजपूत महानगर प्रमुख शरद तायडे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, निलेश चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी मोर्चाचे नियोजनावर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बांधव जास्तीत जास्त संख्येने मोर्चात उपस्थित कसे राहतील यावर देखील चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.