Shivsena UBT News: शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर झाली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे चार वर्षोय बालकाचा बळी गेला आहे. या सर्व प्रकाराला मनपाचा प्रशासनाचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाने आज मंगळवार ३ जून रोजी मनपावर हल्लाबोल चढविला. यावेळी पदाधिकाऱ्यानी ठाकरे शैलीत आंदोलन करत चक्क आयुक्तांच्या टेबलांवर खेळण्याचे कुत्रे चढविले. शिवसेनेच्या अनोख्या आंदोलनाचे शहरात जोरदार चर्चा होती.

मुर्दाबाद मुर्दाबाद… या आयुक्तांचं करायचं काय…, महापालिका प्रशासनाचं करायचं काय… खाली डोकं वरती पाय… अशा घोषणा देत शिवसेना ठाकरे गट आक्रमक होत महापालिकेवर धडक दिली. आयुक्त साहेब, आपण जळगावकरांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली आहे. कमिशनखोरीमुळे जळगावकरांना जीव गमवावा लागत आहे, असा आरोप करीत थेट आयुक्तांना खेळण्यातील भुंकणाऱ्या लहान-मोठ्या पाच-सहा कुत्र्यांची अनोखी भेट देत सतरा मजली हलवून सोडली. आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांबाबत कार्यवाही न झाल्यास खरेखुरे कुत्रे सतरा मजलीत सोडण्यात येतील, असा इशाराही दिला.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून, या कुत्र्यांमुळेच नागेश्वर कॉलनीतील चारवर्षीय बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जळगावकरांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था-संघटनांसह राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मंगळवारी (3 जून) दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हा पदाधिकारी, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक देत आयुक्तांना घेराव घालत जाब विचारला. आंदोलनात माजी नगरसेवक प्रशांत नाईक, अल्पसंख्याक आघाडीचे महानगरप्रमुख जाकीर पठाण, महानगर उपप्रमुख गणेश गायकवाड, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, जिल्हा उपप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, बाळा कंखरे, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, महानगर उपप्रमुख नीता सांगोळे, जया तिवारी, कुसुंबा येथील उपसरपंच प्रमोद घुगे, विभागप्रमुख किरण भावसार, शोएब खाटीक, कलीम खान, शकील रंगरेज, शरद पाटील, विजय राठोड, लखन सांगिले, भय्या वाघ, सौरभ चौधरी, आबिद खान, गोरख केदार, बापू मेने, सतीश मोरे, राहुल पाटील, राहुल शिंदे, नितीन राजपूत, रोहन पराये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

‘मुर्दाबाद मुर्दाबाद… या आयुक्तांचं करायचं काय… खाली डोकं वरती पाय…’, ‘महापालिका प्रशासनाचं करायचं काय… खाली डोकं वरती पाय…’ अशी घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी महापालिकेची सतरा मजली इमारत हलवून सोडली. आंदोलनकर्ते प्रशासकीय इमारतीच्या तेराव्या मजल्यावरील आयुक्तांच्या दालनात जात, तेथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे, मनीषा पाटील, ज्योती तिवारी आदी पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार केला. कुलभूषण पाटील म्हणाले की, या शहरात अवघ्या चारवर्षीय बालकाचा कुत्र्यांनी लचके तोडून मृत्यूच्या घाट उतरवले जाते, तरीही गेंड्यांच्या कातडीचे हे प्रशासन अजूनही जागे झाले नाही. आयुक्त साहेब, आपण जळगावकरांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणली आहे. जो ठेकेदार काम करतो, त्याला महापालिका अधिकारी 25-25 टक्के कमिशन मागतात. तुमच्या कमिशनखोरीमुळे जळगावकरांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून भटक्या कुत्र्यांवर कुठलीही उपाययोजना केली जात नाही. 50 ते 100 भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असतात. मृत बालकाच्या आई-वडिलांची आता मनःस्थिती काय असेल?
प्रशासनाच्या निष्काळजीमुळे त्यांना त्यांचा बालक गमवावा लागला. त्यांना भरपाई द्यावी. बालकाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी, आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, त्याच्या कुटुंबियांना संरक्षण द्या, कुत्र्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, राज्यात फक्त जळगावलाच महापालिका नाही, तर 29 महापालिका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वांना नियम सारखेच आहेत.
महापालिकेवर आमची सत्ता होती, त्या वेळी नियोजनबद्ध मोहीम राबविली जात होती. मात्र, आता प्रशासक असतानाही या मोहिमेसह ठेकेदारही बदलण्यात येत आहे. आता ठेकेदारानेही काम बंद केले आहे. महापालिकेवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर तब्बल पाच-सहा महिन्यांपासून जळगावकरांना या ना त्या कारणातून जीव गमवावा लागला आहे. आतातर चारवर्षीय बालकाला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे जळगावकर संतप्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांबाबत ओरडही होत आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन मांस विक्रेत्यांमुळे कुत्र्यांचा त्रास वाढल्याचे कारण देत आहे आणि मांस विक्री करणाऱ्याला कोण प्रोत्साहन देत आहे, असा प्रश्नही उपस्थित करीत प्रत्येक जळगावकर कर भरतो. त्याच्या सुरक्षेसह नागरी सोयी-सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आयुक्त साहेब, एखाद्याची घरपट्टी थांबली तर तुम्ही त्याच्या घराला कुलूपबंद करतात. पाणीपट्टी न भरल्यास त्याचे नळसंयोजन बंद करतात. जळगावकर कर भरतो, तर त्याची सुरक्षा आणि इतर सुविधा देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे, असे उत्तर आरोग्य अधिकाऱ्यांकडून वर्षभरापासून दिले जात आहे. महापालिकेचे अधिकारी रिकाम्या खुर्च्या तोडतात आणि वेतनही 1 तारखेला घेतात, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी करीत आता खेळण्यातले कुत्रे सोडले, मात्र आठ दिवसांत कुत्र्यांबाबत कार्यवाही न झाल्यास शहरातील भटके कुत्रे जमा करीत थेट प्रशासकीय इमारतीच्या सतरा मजलीत सोडण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांना दिला.
भुंकणारे खेळणीतले कुत्रे आयुक्तांच्या दिशेने…!
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने आयुक्तांच्या टेबलवर कुत्र्यांची खेळणी सोडली. त्यात भुंकणारे कुत्रेही होते. ते भुंकत थेट आयुक्तांकडे जात होते. वारंवार आयुक्तही बाजूला सारत होते. त्यानंतर ते भुंकणारे कुत्रे सुरक्षारक्षक उचलत असताना शिवसैनिक आक्रमक होत सुरक्षारक्षकाला पुन्हा खेळणीतील भुंकणारे कुत्रे टेबलवर ठेवण्यास भाग पाडले. साहेबांकडे कुत्रे जाऊ द्या… असा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेत, चारवर्षीय बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आणि तुम्ही खेळणीतील भुंकणाऱ्या कुत्र्याला घाबरतात, असे म्हणत थेट आयुक्तांना जाब विचारला.
भटक्या कुत्र्यांबाबत कार्यवाही कधी?
आंदोलनप्रसंगी आरोग्य अधिकारी उदय पाटील हेही उपस्थित होते. आंदोलनकर्ते आयुक्तांना जाब विचारताच, त्यांनी थेट आरोग्य अधिकाऱ्यांकडे बोट दाखविले. त्या वेळी पुन्हा आंदोलनकर्ते आक्रमक होत भटके कुत्रे पकडण्याची मोहीम कधी सुरू करतात, हे अगोदर जाहीर करा, आयुक्त साहेब, तुम्ही उत्तर द्या, असा पवित्रा घेतला. घटना घडली तरी पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी एकही अधिकारी गेला नाही, असेही आंदोलनकर्ते म्हणाले.
कुत्र्यांबाबत कार्यवाही लगेच करतो…
जेव्हा एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होते का, असा जाबही विचारत आरोग्य अधिकारी पाटील यांना आंदोलनकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले. ठेकेदार तीन वर्षांपासून काम करीत होता, तो काम सोडून कसा गेला, याची चौकशी करावी. आरोग्य अधिकारी पाटील म्हणाले की, आजपासूनच कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली जाणार असून, त्यासंदर्भात आता तातडीची बैठकही घेतली जात आहे. शिवाय, कुत्रे पकडण्याच्या मोहिमेबाबत नियोजनही झाले असल्याचे सांगितले.
आता खरेखुरे कुत्रे सतरा मजलीत सोडणार!
महापालिकेचे अधिकारी रिकाम्या खुर्च्या तोडतात आणि वेतनही 1 तारखेला घेतात. मात्र, ते कर्तव्यात कसूर करतात. आता आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांबाबत कार्यवाही न झाल्यास शहरातील भटके कुत्रे सर्व शिवसैनिक एकत्र करून महापालिका सतरा मजली इमारतीत सोडतील आणि त्याच्या परिणामास सर्वस्वी प्रशासनाचे प्रमुख अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी असेल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.
दरम्यान, मोकाट श्वान प्रश्नी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरातील नागेश्वर कॉलनीतील चारवर्षीय बालकाचा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, ही घटना दुःखदायक आहे. पशुप्राणी क्लेष कायद्यांतर्गत कुत्र्यांबाबत कार्यवाही केली जाईल. तसेच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासंदर्भात निविदाप्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण केली जाईल.