---Advertisement---
जळगाव : बालिववाह रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. मात्र त्याचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही. वर्षभरात जिल्ह्यात ७५८ बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. त्यात जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक १५० तर पारोळा तालुक्यात ११६ बालविवाह झाले आहेत. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यात ११० तर पाचोरा तालुक्यात १०७ बालविवाह झाल्याची नोंद झाली आहे.
---Advertisement---
१८ वर्षाखालील विवाहित व गर्भवती मातांच्या आकडेवारीवरून आरोग्य विभागाला बालविवाहाची आकडेवारी प्राप्त झाली आहे. शासनस्तरावर बालविवाहाला अटकाव घालण्यासाठी कायदे व नियमावली तयार करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात बालविवाहाला कोणत्याही प्रकारचे बंधन राहिले नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्यातील ही बाब चिंताजनक असून बालविवाह संदर्भात जनजागृती प्रभावीपणे करण्याची गरज आहे. जिल्ह्यात चोपडा, रावेर, यावल या आदिवासी बहुल परिसरात बालविवाहाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामानाने सुशिक्षित आणि प्रगत तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात एकही बालविवाहाची नोंद नाही. मुक्ताईनगर तालुक्यात चार बालविवाह झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
समाजाने मानसिकता बदलण्याची गरज
जिल्ह्यातील बोदवड १४, भडगाव १९, एरंडोल १६, जामनेर २०, चोपडा २४, रावेर ४४, यावल ५५, धरणगाव ५६, जळगाव २३ अशी संख्या बालिववाहाची या तालुक्यात आहे. जनजागृतीअभावी चार तालुक्यात प्रमाण वाढले आहे तर त्या तुलनेत इतर ११ तालुक्यात हे प्रमाण कमी आहे. शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी कमी वयाच्या गरोदर माता दाखल झाल्यास सासर व माहेराकडील मंडळीवर गुन्हा दाखल करण्याची अनेक प्रकरणे आहेत. त्यासाठी समाजाने मुलीच्या कमी वयात विवाह लावण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.