धक्कादायक ! दहावीत ९२% गुण मिळवूनही विद्यार्थिनीची आत्महत्या

---Advertisement---

 

दहावीच्या सीबीएसई परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवलेल्या १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच वैशाली सिंगने आपल्या घरात गळफास घेत जीवन संपवले. ही धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडली असून या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रतनपूर येथील शिवालिका भवनमध्ये राहणारी वैशाली, अरमापूरमधील केंद्रीय विद्यालय-१ येथे शिकत होती. बुधवारी संध्याकाळी सीबीएसईचा निकाल लागला आणि वैशालीने ९२ टक्के गुण मिळवले. तिच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी हा आनंदाचा क्षण होता, मात्र वैशाली आतून अस्वस्थ होती.

गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास, तिची आई काजलने वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेपोटी तिने मुलगा प्रिन्सला वर जाऊन पाहण्यास सांगितले. खोलीत गेल्यावर प्रिन्सला वैशाली गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबाने तत्काळ पोलिसांना कळवले. पांकी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तिचा मोबाईल तपासासाठी जप्त केला.

तपासादरम्यान वैशालीने मित्रांना पाठवलेले व्हॉइस मेसेज समोर आले. त्यामध्ये ती अत्यंत खचलेली असल्याचे स्पष्ट दिसून आले. “मी आता जगू शकत नाही, मी जणू जिवंत प्रेत झाले आहे,” असे ती म्हणाली होती. तसेच, आईवर होणारा आर्थिक ताण आणि आपल्या शिक्षणासाठी खर्च होणारा पैसा वाया जाईल, या भीतीने ती त्रस्त होती.

वैशालीच्या कुटुंबाची परिस्थितीही कठीण होती. दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर घराचा संपूर्ण भार आई काजलवर आला, जी एका कपड्यांच्या दुकानात काम करून संसार चालवत होती. वडिलांच्या निधनानंतर काही काळ दोन्ही भावंडांचे शिक्षणही खंडित झाले होते. प्रिन्स सध्या ११वीत असून त्याचे शैक्षणिक प्रदर्शन अपेक्षेप्रमाणे नव्हते.

कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, शाळेतील काही शिक्षक वैशालीची तिच्या भावाशी तुलना करत असत. “तू त्याच्यासारखीच आहेस, तुला चांगले गुण मिळणार नाहीत,” असे टोमणे तिला वारंवार ऐकावे लागत होते. या सततच्या दबावामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्थिर झाली होती. घरी आल्यावर ती अनेकदा रडायची आणि आईशी मन मोकळं करायची.

आईने तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि वैशालीनेही स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. मेहनतीमुळे तिच्या गुणांमध्ये सुधारणा झाली, पण मनावरचा ताण कमी झाला नाही. हळूहळू ती अबोल झाली, एकटी राहू लागली आणि तिच्या वागण्यात बदल जाणवू लागला.

भावाच्या मते, शिक्षकांकडून होणारी तुलना आणि सततचा ताण यामुळे वैशाली स्वतःला कमी लेखू लागली होती. ९२ टक्के गुण मिळूनही तिला स्वतःचे यश अपुरे वाटत होते. याच मानसिक स्थितीतून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नसून, तक्रार मिळाल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---