---Advertisement---
मुक्ताईनगरच्या तहसील कार्यालयात कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निवासी नायब तहसीलदारांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. नागरिकांच्या कामात अडथळे येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कार्यालयाची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना देखील तहसील कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. अनेकदा ते उशिरा कार्यालयात येतात, तर काही वेळा कार्यालयीन वेळ पूर्ण होण्यापूर्वीच निघून जात असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांचे महत्वाचे काम हे प्रलंबित राहतात. काही नागरिकांच्या मते, दुपारनंतर किंवा सायंकाळी उशिरा त्यांची उपस्थिती दिसून येते. त्यामुळे नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मुक्ताईनगर शहरातील नागरिकांनी तहसीलदारांकडे याबाबत विचारणा केली असता, तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मुक्ताईनगर नायब तहसीलदार कार्यालयात केव्हा येतील याची प्रतीक्षा करत नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिस्त लावावी, तसेच प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









