खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं; माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : अवघ्या महाराष्ट्रात मुलूख मैदान तोफ म्हणून प्रचलित असलेल्या अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.  वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.  गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी विचारसरणीच्या दमदार फळीतील शेवटचा नेता निखळला आहे.

शेतकर्‍यांसाठी शिंगाडे मोर्चा काढणे, सभागृहातून राजदंड पळवणे आदी कारणांमुळे ते नेहमीच चर्चेत राहायचे. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांचा महाराष्ट्रभरात दरारा होता.  दीर्घ काळ जनता दलात राहिल्यानंतर राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाषणांनी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला होता.

या दरम्यान, अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं. अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.