---Advertisement---
जळगाव : शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात रंगलेली हलकीफुलकी टोलेबाजी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. दोन्ही नेत्यांच्या खास शैलीतील जुगलबंदीमुळे कार्यक्रमाला राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले.
उद्घाटन सोहळ्यास गिरीश महाजन उशिरा पोहोचतील, अशी शंका व्यक्त करत गुलाबराव पाटील यांनी आमदारांसोबत शर्यत लावल्याचा किस्सा रंगवला. “महाजन वेळेवर येत नाहीत,” असे म्हणत त्यांनी चिमटे काढले. तसेच “कुंभमेळ्याचे मालक आणि साधूंचे साधू” अशा शब्दांतही त्यांनी मिश्कील टोले लगावले.
यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनीही खास शैलीत पलटवार केला. “मी वेळेवर आलो, त्यामुळे गुलाबराव पाटलांची शर्यत हरली—हे त्यांचे बॅडलक,” असे म्हणत त्यांनी वातावरण हलकेफुलके ठेवले. पुढे ते म्हणाले, “मी वेळेवर आलो नसतो, तर रिबीन कापण्याऐवजी गुलाबराव पाटलांनीच उद्घाटन करून टाकले असते.”
दोन्ही नेत्यांमधील ही टोलेबाजी आणि जुगलबंदी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. उपस्थितांमध्ये हास्याचे वातावरण निर्माण झाले असून, हा प्रसंग सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.









