---Advertisement---

भुसावळ येथून विशेष रेल्वे गाडीने हजारो वारकरी पंढरपूरला रवाना

---Advertisement---

भुसावळ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकऱ्यांना विशेष अनारक्षित मोफत रेल्वे गाडी आज भुसावळ रेल्वे स्थानकावरून भक्तिमय वातावरणात रवाना झाली.

या विशेष गाडीला केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हरी झेंडा दाखवून पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वे भुसावळ विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महायुती व भाजपा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


यावर्षीच्या वारीसाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष गाडीची विनंती केली होती. त्यानुसार आज शनिवारी ( 5 जुलै ) रोजी दुपारी 1.30 वाजता भुसावळहून पंढरपूरकडे गाडी क्रमांक 01159 ने हजारो भाविक रवाना झालेत.

---Advertisement---


उल्लेखनीय बाब म्हणजे, या विशेष गाडीतील सर्व जनरल (अनारक्षित) तिकिटांची रक्कम स्वतः रक्षा खडसे यांनी स्वखर्चातून भरली असून ही संपूर्ण सेवा वारकऱ्यांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाडी 6 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचेल व त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता परतीच्या प्रवासासाठी निघेल. ही गाडी 7 जुलै रोजी पुन्हा भुसावळला परत येणार आहे.

गाडी रवाना होण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या व विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेऊन परत आशीर्वाद घेऊन यावे, असे आवाहनही केले. भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाचा गजर, “माऊली माऊली” च्या जयघोषात ही गाडी प्रस्थान करताना वातावरण भारावले होते.या उपक्रमामुळे रावेर लोकसभा क्षेत्रातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---