जळगाव : उन्हाळाच्या सुटीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोघां मुलांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (२ जून )अमळनेर तालुक्यात घडली. ही घटना सायंकाळी उघड झाली. दोघांपैकी एकाचा मृतदेह त्याच दिवशी रात्री तर दुसऱ्या मुलाचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. दरम्यान, ही मुलं आपल्या कुटुंबीयांची नजर चुकवून तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते.
चेतन धनराज पवार (वय ९), मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (वय१२) हे दोघे मित्र अमळनेर तालुक्यातील नीम येथे राहतं होते. दोघांना शाळेला उन्हाळी सुटी असल्याने ते नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास गावालगतच्या तापी नदीवर पोहण्यास गेले होते. परंतु, दुपारचे चार वाजले तरी दोघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेत होते. त्या दोघांनी नदीत पोहण्यासाठी उतरण्यापूर्वी अंगातील कपडे काठावर दगडांखाली ठेवले होते. सायंकाळी सहाला गावातील गुराखी नदीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेल्यावर त्यांना तिथे दगडाखालील कपडे दिसून आले.

यामुळे नीम गावात ते कपडे कोणत्या मुलांचे आहेत म्हणून चर्चा सुरु झाली. हरीश आणि चेतन यांचे नातेवाईक त्यांना शोधत होतेच. त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मुलांचे कपडे ओळखले. त्यानंतर दोघेही तापीच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता गृहीत धरून त्यांचे मृतदेह शोधण्यास सुरूवात झाली. अधिक शोध घेतला असता चेतनचा मृतदेह काठावर सापडला. त्याचे शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरा मृतदेह सकाळी सापडला आहे. मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे. मयूर उर्फ हरीशचे वडील शेतमजूर आहेत. त्याला एक बहीण आहे. तर चेतनचे वडील मयत झाले असून तो आपल्या आजोबांकडे राहत होता. त्याला एक बहीण आहे.