---Advertisement---
शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांवर ओढवलेल्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटावर अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मालपूर धरणातून पिण्याचे पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामपूरसह विखरण, खर्दे, मांडळ, मेथी, रामनगर आणि सोनशेलू या गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात कामपूर गावाच्या वतीने सरपंच माधुरी विष्णू पाटील यांनी २२ जानेवारी रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देत पाणीटंचाईची गंभीर समस्या मांडली होती. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले होते.
या समस्येची तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आणि मालपूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने तत्परता दाखवत या निर्णयाची अंमलबजावणी केली.
दरम्यान, स्थानिक पातळीवरही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी प्रयत्न केले. जलसाठा उपलब्ध झाल्यानंतर काही ठिकाणी चारी तयार करून पाणी साठवण्यात आले, ज्यामुळे गावांचा पिण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली. तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या कामपूर, विखरण आणि मेथी परिसरातील तलाव भरल्याने अनेक गावांमधील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.









