अहिल्यानगर : ”माझ्यासोबत चल, अन्यथा तुझ्या नवऱ्यासह मुलांना ठार करेल ”, अशी धमकी देत मित्रानेच विवाहितेचा विनयभंग केला. राहुरी तालुक्यातील एका गावांत ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाण्यात मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील एका गावांत ३२ वर्षीय विवाहित तरुणी वास्तव्याला आहे. तिचे अक्षय नावाच्या तरुणाशी मैत्रीचे संबंध आहेत. दोघे मित्र-मैत्रीण असल्याने अक्षयने त्या तरुणीचे फोटो व व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये काढले आहेत. ही तरुणी सोमवारी (१६ जून ) रोजी राहुरी तालुक्यातील तिच्या नातेवाईकांकडे आली होती.
यावेळी हा तरुण देखील तिच्या मागोमाग मंगळवारी (१७ जून) रोजी राहुरी येथे आला. यावेळी त्याने दारु पिलेली होती. त्याने या तरुणीचा हात धरला. त्याने तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत धमकी दिली. तू जर माझ्या सोबत आली नाहीस तर तुला, तुझ्या नवऱ्याला व मुलांना ठार करेल अशी धमकी दिली तसेच तिला शिवीगाळ केली. माझ्याकडे आपल्या दोघांचे फोटो आहेत. ते फोटो मी व्हायरल करेल, अशी धमकी देखील या तरुणीला दिली.
या घटने नंतर घाबरलेल्या तरुणीने राहुरी पोलिस स्टेशन गाठले. तिने या तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कैलास आहेर (रा. झरेकाठी, ता. संगमनेर ) याच्या विरोधात विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करीत आहे.