जळगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन नागरिकांनी प्राण गमावले आहेत. या घटना शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, अपघाताचे नेमके कारण, जबाबदार व्यक्ती, पुरावे मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे सीसीटीव्ही कॅमेरे अनेक भागांमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
शहरातील महाबळ परिसरात घडली. सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला तर दुसरी घटना रामानंद नगरमधील पार्वती नगर परिसरातील एका ४५ वर्षीय महिलेला मद्यधुंद चारचाकी चालकाने जोरदार धडक दिली. हिट अँड रन पद्धतीने चालक घटनास्थळावरून फरार झाला. व त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना यश ही मिळाले आहे. या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दोन्ही घटनांनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे.
अपघातानंतर संबंधित वाहन वा आरोपीचा ठावठिकाणा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरते, मात्र अनेक ठिकाणी कॅमेरेच नसल्यानं पोलिसांच्या तपासावरही मर्यादा येत आहेत. शहरातील अपघातांव्यतिरिक्त चैन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग, घरफ ोड्या, वाहन चोरी यांसारख्या घटना वारंवार घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक झाले आहे. अनेक शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असून, तशाच पद्धतीने जळगावमध्येही यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस प्रशासन व महापालिकेने तत्काळ लक्ष घालून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया जलद गतीने राबवावी, अशी जोरदार मागणी सध्या शहरवासीय करत आहेत.