---Advertisement---
कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होत आहे. अधिवेशन काळात त्या समितीची घोषणा करू. कर्जमाफी देताना ती गरजू शेतकऱ्यांना मिळेल, शेतीवर कर्ज काढून मर्सिडीज घेणाऱ्यांना, शेतात फार्महाऊस बांधणाऱ्यांना, शेतात टाकणाऱ्यांना लेआऊट मिळणार नाही, याची निश्चित काळजी घेतली जाईल, असे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
अमरावती दौऱ्यावर असलेले पालकमंत्री बावनकुळे यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील कार्यक्रमात व पत्रकारांशी बोलताना भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कालच चर्चा झाली आहे. कर्जमाफीचे निकष ठरविणारी समिती तयार होत आहे.
अधिवेशन काळात त्या समितीची घोषणा होईल. ३ जुलैला दुपारी ४ वाजतापासून विधानभवनात माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासोबत विविध विषयांवर बैठका होणार आहेत. रात्री १० वाजेपर्यंत या बैठका माझ्या दालनात होतील. यावेळी विविध खात्यांचे आठ मंत्री सोबत असतील. महत्त्वाच्या निर्णयाचे शासन निर्णय होतील. कर्जमाफी देताना धनदांडग्याना ती मिळणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
आमच्या सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. ती म्हणजे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. शेतीवर कर्ज काढून ज्यांनी मर्सिडीज घेतल्या, लेआऊट टाकले, फार्महाऊस बांधले त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. जी समिती गठित होणार आहे, ती हे शोधून काढणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.