---Advertisement---
राज्य सरकारला हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधुंनी विजयी मेळावा घेतला. यानंतर आता ते कायमचे एकत्र आले आहेत. त्यांच्यात युती होणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत भाजप-शिवसेना युतीवर टीका केली होती. त्यांनी, आम्हाला राज ठाकरेंशी युती करायची असेल तर ती खुलेपणाने करू, चोरुन मारून नाही, असे म्हटले होते. यावरून शिवसेना शिंदे गटातील बड्या नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. या नेत्याने उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत, पण राज ठाकरे अद्याप काहीच बोलत नसल्याचा टोला लगावला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना (शिंदे गट ) विरूद्ध शिवसेना (ठाकरे गट) असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मनसेशी युतीबाबत तुमची राज ठाकरेंशी चर्चा झाली का? लोकांचा रेटा आहे की तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) राजकीय दृष्ट्या एकत्र यावं, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ठीक आहे, आता २० वर्षांनी एकत्र आलो आहोत. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असाही त्याचा भाग नाही. पण मी जे काही म्हटलं की मराठी भाषेसाठी, मराठी धर्मासाठी आणि मराठी आस्मितेसाठी जे-जे करण्याची गरज आहे, ते-ते करण्याची माझी तयारी आहे’, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीबाबत केलं. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर रामदास कदम यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
‘एका पक्षाचा नेता आणि शिवसेना प्रमुखांचा मुलगा निवडणूक आयोगाला धोंडा म्हणतो आहे. हे काय बिहार आहे का? वाट्टेल ते पंतप्रधानांबाबत बोलायचं, गृहमंत्र्यांबाबत बोलायचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलायचं, नको नको ते शब्द एकनाथ शिंदेंना वापरायचे आणि पुन्हा पंतप्रधानांच्या पायावर साकडं घालायचं की मला वाचवा आणि मुलाला वाचवा. दिशा सालियन प्रकरणातून त्याला बाहेर काढा. उद्धवजी तुम्हाला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पितं, तसं नाही सगळ्यांना ते दिसतं. मला अनेक गोष्टी माहीत आहे. कशा पद्धतीने क्लिन चिट मिळाली ते माहिती आहे. मी न्यायालयावर काही बोलणार नाही. उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं आहे. आता आम्हाला भाजपासोबत घ्या आणि एकनाथ शिंदेंना बाजूला करा मग मी येतो अशा अटी टाकल्या जात आहेत.’ असं रामदास कदम म्हणाले.