---Advertisement---
मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या राजकारणात आज घडामोडींनी वेग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर पक्षाने नेतृत्वाबाबत तातडीने पावले उचलली आहेत.
आज दुपारी विधिमंडळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव दिलीप वळसे पाटील यांनी मांडला, तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. बैठकीत कोणताही विरोध न होता निर्णय मंजूर करण्यात आला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजता राजभवनात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सध्या केवळ त्यांचाच शपथविधी होणार असून मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.
खात्यांबाबत विचार केला तर, अजित पवारांकडे असलेली काही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवारांकडे कायम राहणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडेच राहणार असून अर्थ खाते सध्या वगळण्यात आले आहे. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुन्हा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच राज्याच्या राजकारणात हा निर्णय निर्णायक ठरणार असून, येत्या काळात सत्तासमीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.









