---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पर्यटन शाखेने (आयआरसीटीसी) यात्रेकरूंसाठी एका महत्त्वपूर्ण आणि विशेष उपक्रमांतर्गत भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून सात ज्योतिर्लिंगांसाठी एक पॅकेज सुरू केले आहे. देशभरातील लोकांना एकाच प्रवासात प्रमुख धार्मिक स्थळांचे विशेष दर्शन उपलब्ध करून देणे आणि यात्रेकरूंसाठी तीर्थयात्रा सुलभ व परवडणारी बनवणे, हा या योजनेचा उद्देश आहे.
११ रात्र आणि १२ दिवसांची ही पवित्र आध्यात्मिक यात्रा २७एप्रिलपासून गोरखपूरमधून सुरू होणार आहे. ही विशेष ट्रेन यात्रेकरूंना भगवान शिवाच्या प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवून देईज. यात महाकालेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, सोमनाथ मंदिर, नागेश्वर मंदिर, भीमाशंकर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि घृष्णेश्वर मंदिराचा समावेश आहे.
या पॅकेजमध्ये ट्रेन, हॉटेल, भोजन, बस सेवा आणि मार्गदर्शक सर्व सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागत नाही. सर्व वर्गातील प्रवाशांसाठी स्लीपर, ३एसी आणि २एसी वर्ग उपलब्ध आहेत. भारत गौरव पर्यटक ट्रेन हा भारतीय रेल्वेचा एक अनोखा उपक्रम आहे, जो थीम आधारित सहलींच्या माध्यमातून देशातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांना जोडतो.









