---Advertisement---
नवी दिल्ली : आगामी खरीप हंगामासाठी देशात बियाणे आणि कृषी-रसायनांचा (कीटकनाशकांचा) पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, साठेबाजी, काळाबाजार, तस्करी आणि खतांचा कृषीव्यतिरिक्त इतर कामांसाठी होणारा वापर रोखण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले.
पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर आयोजित आंतर-मंत्रालयीन बैठकीला संबोधित करताना कृषी मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव मनिंदर कौर द्विवेदी म्हणाल्या, शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बियाणे. आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची उपलब्धता पुरेशी आहे. खरीप २०२६ हंगामासाठी बियाण्यांची एकूण अंदाजित गरज १६६.४६ लाख क्विंटल इतकी आहे, तर उपलब्ध साठा १८५.७४ लाख टन इतका आहे. त्यामुळे, सध्या १९.२९ लाख टन बियाणे अतिरिक्त स्वरूपात उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रमुख पिकांसाठी बियाणे उपलब्ध
द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात भात पिकासाठी बियाण्यांची एकूण उपलब्धता ८०.९ लाख क्विंटल, सोयाबीन ३५.७ लाख क्किंटल, भुईमुग २१.१ लाख क्विंटल आणि मक्यासाठी ११.९ लाख क्किंटल बियाणे उपलब्ध आहे. सर्व राज्यांमध्ये बियाण्यांची उपलब्धता पुरेशी आहे. आगामी खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामाचा विचार करता बियाण्यांच्या बाबतीत आपली स्थिती अत्यंत समाधानकारक आणि सुरक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खतांचा १८० लाख टन साठा उपलब्ध
खतांच्या साठ्याबाबत माहिती देताना द्विवेदी पुढे म्हणाल्या, खरीप हंगामासाठी खतांची एकूण गरज ३९०.५४ लाख टन इतकी आहे. हंगामाच्या सुरुवातीचा (ओपनिंग) साठा १८० लाख टन इतका आहे, जो एकूण गरजेच्या ४६ टक्के इतका आहे.









