---Advertisement---
नाशिक येथे आयटी कंपनीच्या आडून सुरू असलेल्या धर्मांतर आणि महिलांच्या शोषणाच्या धक्कादायक रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात कॅप्टन अशोक खरात, रविंद्र एरंडे यांच्यासह एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, बेरोजगार पदवीधर तरुणी आणि महिलांना आकर्षक पगाराचे आमिष दाखवून एका नामांकित कंपनीत नोकरी दिली जात होती. कॉल सेंटरप्रमाणे काम करून घेत असताना टीम लीडरमार्फत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते.
विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित तरुणींवर मानसिक छळ, विनयभंग आणि लैंगिक शोषण केले जात होते. या सर्व प्रकारामागचा मुख्य उद्देश त्यांचे धर्मांतर करणे हा असल्याचे तपासात समोर आले आहे.
महिला पोलिसांचे अंडरकव्हर ऑपरेशन
या गंभीर प्रकरणाची दखल घेत नाशिक पोलीस यांनी गुप्त कारवाई हाती घेतली. पीडित तरुणीने थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर सात सदस्यीय विशेष पथक तयार करण्यात आले.
महिला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःची ओळख लपवून त्या कंपनीत नोकरी मिळवली. तब्बल आठ दिवस त्यांनी तिथे काम करत आरोपींच्या बैठका, दबाव टाकण्याच्या पद्धती आणि शोषणाचे प्रकार याचे ठोस पुरावे गोळा केले.
दरम्यान, पीडितांनी याबाबत कंपनीच्या HR विभागाला माहिती दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही समोर आले आहे.
कारवाई आणि पुढील तपास
पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी कंपनीवर छापा टाकत 9 गुन्हे दाखल केले आणि 6 आरोपींना अटक केली. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
या प्रकरणात 8 महिलांनी लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत तक्रार दिली असून एका पुरुषानेही छळाची तक्रार केली आहे.
कंपनीची HR अधिकारी अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असून तिला नोटीस देण्यात आली आहे.
सध्या पाच आरोपी पोलीस कोठडीत असून एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. एक महिला आरोपी फरार असून तिचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









