---Advertisement---
मुंबई/जळगाव:
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा झपाट्याने वाढल्याने नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अहवालानुसार, राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि मालेगाव ही शहरे रविवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरे ठरली आहेत. येथे कमाल तापमान 41°C नोंदवण्यात आले आहे.
विभागावर तापमानाची स्थिती:
उत्तर महाराष्ट्र: जळगाव आणि मालेगावमध्ये पारा ४१ अंशांवर असून सोमवारी देखील तापमान वाढते राहण्याचा अंदाज आहे.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र: पुण्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली असून पारा 40°C वर पोहोचला आहे. सोमवारी हे तापमान 42°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषतः लोहगाव आणि कोरेगाव पार्क परिसरात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे. सोलापूरमध्ये 41.4°C, तर सांगली आणि जेजुरी येथे 40°C तापमानाची नोंद झाली आहे.
विदर्भ: अकोल्यात शनिवारी तापमान 42°C च्या पुढे गेले होते, तर रविवारीही हीच स्थिती कायम होती. नागपूर जिल्ह्यातही तापमान 39.4°C पर्यंत पोहोचले आहे.
कोकण किनारपट्टी: ठाणे, पालघर आणि रायगड भागात तापमान २ किव्हा २४ अंशांच्या दरम्यान असले तरी दमट हवामानामुळे (Humidity) नागरिक घामाच्या धारांनी हैराण झाले आहेत. येथे कमाल तापमान 36°C पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मिळालेला दिलासा आता पूर्णपणे संपला असून उन्हाचा कडाका वाढला आहे. हवामान विभागाने आगामी काही दिवसांत ‘उष्णतेची लाट’ (Heatwave) येण्याचा इशारा दिला आहे.
नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना:
दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणे टाळावे.
शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्यावे.
उन्हापासून संरक्षणासाठी सुती कपड्यांचा वापर करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
वाढत्या तापमानामुळे सोमवारी देखील राज्याच्या विविध भागांत पारा चढलेलाच राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.









