---Advertisement---
चंद्रपूर : महाराष्ट्रात पहिल्यांदाच वर्धा नदीच्या किनारी धानोरा, भोयेगाव पुलाजवळ बायसन, हरिण, डुक्कर व मानवी अल्प जीवाश्मे तसेच पाषाणयुगीन अवजारे सापडली असून, ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टेसीन काळातील २० हजार वर्षांदरम्यान अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची माहिती चंद्रपूरचे भूशास्त्र आणि पुरातत्त्व अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली.
आजपर्यंत अशी जीवाश्मे महाराष्ट्रात आढळली नसल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे. कमी प्रमाणात बायसन व हरणाचे हाड, मानवाच्या पाषाणयुगीन अवजारांसोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडेही आढळली आहेत.
पाषाणयुगीन मानवांची अवजारेसुद्धा या प्राण्यांच्या जवळच आढळली असून, मानव त्यांची शिकार करीत होते, हे सिद्ध होते. २० हजार वर्षांदरम्यान जगात हिमयुग होते. त्यानंतर ते तापमानामुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. याच महापुरात विदर्भ आणि चंद्रपूरमधील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले. काही हजार वर्षांनंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले. वर्धा नदीच्या काठावरील वरोडा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात, अशी माहिती चोपणे यांनी दिली.
२०० ते २० हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म
चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्र आणि जीवाश्मांच्या बाबतीत देशात सर्वाधिक महत्त्वाचा जिल्हा आणि भूशास्त्रीय संग्रहालय मानला जातो. २०० कोटी ते २० हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म आढळते. त्यातील १५० कोट्यवधी वर्षांचे स्ट्रोमॅटोलाईट, २० कोटी वर्षांचे वृक्ष आणि पानांचे जीवाश्म, ६ कोटी वर्षांची डायनासोर, वृक्ष, शंख-शिंपले आणि अगदी अलिकडील २० हजार वर्षांच्या हत्तीचे जीवाश्म आहेत. अलिकडील प्राण्यांचे जीवाश्म भारतात क्वचितच आढळली आहेत. देशात प्रथमच अशी जीवाश्म चंद्रपूर शहराजवळ सापडल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे.









