---Advertisement---
न्यू यॉर्क : भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ६.४ टक्के आणि २०२७ मध्ये ६.६ टक्के दराने वाढण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाने वर्तवला आहे. दक्षिण आणि नैऋत्य आशियातील अर्थव्यवस्थांची वाढ २०२५ मध्ये ५.४ टक्क्यांनी झाली. ही वाढ २०२४ मधील ५.२ टक्क्यांच्या तुलनेत अधिक असून, प्रामुख्याने भारतातील भक्कम वाढीमुळे ती साध्य झाली, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आशिया आणि प्रशांतसाठी आर्थिक व सामाजिक आयोगाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थांकडून मजबूत उपभोग तसेच वस्तू आणि सेवा कराच्या दरातील कपात आणि अमेरिकेच्या शुल्काची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निर्यातीला दिलेल्या गतीच्या बळावर २०२५ मध्ये भारताची आर्थिक वाढ किंचित वाढून ७.४ टक्क्यांवर पोहोचली, असे आशिया आणि प्रशांतच्या आर्थिक सर्वेक्षण-२०२६ या शीर्षकाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सेवा क्षेत्राचा मोठा वाटा
भारतात ऑगस्ट २०२५ मध्ये ५० टक्के शुल्काची अंमलबजावणी झाल्यावर अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीत २५ टक्क्यांची घट झाल्यामुळे, २०२५ च्या उत्तरार्धात आर्थिक घडामोडींचा वेग मंदावला. सेवा क्षेत्र मात्र विकासाचे एक प्रमुख चालक म्हणून कायम राहिले, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.।









