---Advertisement---
जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक ताण आणि रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने राज्य सरकारकडे २०० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी केली आहे. यासंदर्भात महापौर सौ. दीपमाला काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, जळगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असल्यामुळे शासकीय कार्यालये, बाजारपेठ, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परिणामी, शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या निवासी भागांमध्ये गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनेक रस्ते अद्याप कच्चेच असून, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तसेच, निधीअभावी नवीन रस्ते बांधकाम व दुरुस्तीची कामे हाती घेणे महानगरपालिकेला शक्य होत नसल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, शहरातील रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी किमान २०० कोटी रुपयांचे विशेष रस्ता अनुदान तातडीने मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहर विकासासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.








