---Advertisement---
अमळनेर : वैशाख शुद्ध पौर्णिमेनिमित्त १ मे रोजी संत सखाराम महाराज यात्रोत्सवातील पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत अमळनेर नगरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाली.
परंपरेनुसार सकाळी वाडी संस्थानमध्ये हभप प्रसाद महाराज यांच्या हस्ते लालजी तसेच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा पार पडली. त्यानंतर नदीत समाधी दर्शन घेऊन लालजींची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात आली आणि मिरवणुकीस प्रारंभ झाला.
मिरवणुकीत भालदार-चोपदार, सजवलेला संतांचा पुतळा, विविध धार्मिक देखावे, लेझीम पथके आणि वाद्यवृंद यामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण लाभले. मार्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. वाडी चौक ते बोरी पुलापर्यंत मिरवणूक जल्लोषात पार पडली.
पैलाड येथे ढोल-ताशांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले. रात्री उशिरा समाधीस्थळी पोहोचल्यावर अभंगगायनाने वातावरण भारावले. परंपरेप्रमाणे गुलाल उधळण्यात आला. भाविकांनी याला पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाची अनुभूती मानत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
दरम्यान, विविध मंडळांनी प्रसाद, लस्सी, ताक व थंड पेयांचे वाटप करून सेवाभाव जपला. मिरवणूक मार्गावर पोलीस व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. या सोहळ्यात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









