---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उन्हाचा तीव्रतेने परिणाम होत असून भूजल पातळी झपाट्याने खाली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शेलावे येथे एक विहीर अधिग्रहित करण्यात आली असून, खेडी भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. तसेच मोहाडी येथील विहीर अधिग्रहित करण्याचाही प्रस्ताव पुढे आला आहे.
मागील वर्षीही तालुक्यात दोन टँकर आणि सात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही दिवसांत दोन ते तीन ठिकाणी टँकरची गरज भासू शकते, असे संकेत मिळत आहेत.
वाढत्या उष्णतेमुळे भूजल पातळी सतत घसरत असून परिस्थिती अधिक चिंताजनक बनत आहे. तरीही तामसवाडी बोरी धरणातील साठा लक्षात घेता डिसेंबर २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नसल्याची माहिती अभियंता पी. जे. काकडे यांनी दिली आहे. यासोबतच, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा आणि अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.









