---Advertisement---
स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू याला राजस्थान उच्च न्यायालयाने अतिशय मोठा दणका दिला आहे. २०१३ मधील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती योगेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती अरुण मोंगा यांच्या खंडपीठाने आसारामला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला असून, सध्या पॅरोलवर असलेल्या आसारामला तातडीने तुरुंगात हजर होण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र, या प्रकरणात आसारामचे सहआरोपी शरद आणि शिल्पी यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.
राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालातील ५ महत्त्वाचे मुद्दे
१. जन्मठेप कायम, पॅरोल संपला: आसारामने अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याची जन्मठेप कायम राहील आणि त्याने त्वरित तुरुंगात हजर व्हावे.
२. सामूहिक बलात्काराच्या आरोपातून मुक्तता: आसारामवर लावण्यात आलेला सामूहिक बलात्काराचा (IPC ३७६ ड) आणि गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप न्यायालयाने हटवला आहे. सादर झालेले पुरावे सामूहिक बलात्काराचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत, असे कोर्टाने म्हटले.
३. कायद्यानुसार आरोप सिद्ध: भारतीय न्याय संहितेनुसार आसारामवर झालेले बलात्कार आणि लैंगिक छळाचे आरोप पूर्णपणे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे शिक्षेत सूट मिळण्याचा प्रश्नच येत नाही.
४. शिल्पी आणि शरद यांची निर्दोष सुटका: विशेष न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवले होते. (त्यांच्यावर पीडितेची आसारामशी भेट घडवून आणल्याचा आरोप होता). मात्र, उच्च न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे दोघांची सुटका केली आहे.
५. शिष्यांची सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी: उच्च न्यायालयाच्या या झटक्यानंतर आसारामचे अनुयायी आता या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (सुप्र्रीम कोर्ट) दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे? (२०१३ ते २०२६ चा प्रवास)
साम्राज्याला उतरती कळा: १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर पहिला आश्रम सुरू करणाऱ्या आसारामने देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले होते. देशातील बडे नेतेही त्याच्या दरबारात हजेरी लावत असत. मात्र, २०१३ मध्ये जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर या साम्राज्याला उतरती कळा लागली.
२०१८ चा ऐतिहासिक निकाल: एप्रिल २०१८ मध्ये जोधपूरच्या विशेष बाल न्यायालयाने आसारामला मानवी तस्करी, सामूहिक बलात्कार, धमकी देणे आणि कट रचणे या आरोपांखाली दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
साक्षीदारांच्या हत्यांचे सत्र: या प्रकरणाची धक्कादायक बाजू म्हणजे, तपासादरम्यान आसारामच्या विरोधात साक्ष देणारे अनेक साक्षीदार संशयास्पद रितीने मृत आढळले. २०१४ मध्ये अमृत प्रजापती यांची राजकोटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ज्यामध्ये आसारामच्याच अनुयायाचा हात असल्याचे समोर आले होते.
मुलालाही तुरुंगवास: आसाराम पाठोपाठ त्याचा मुलगा नारायण साई याच्यावरही बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून, तोही सध्या तुरुंगात आहे.
उच्च न्यायालयाच्या या ताज्या निर्णयामुळे आता आसाराम बापूचा तुरुंगातील मुक्काम कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.









