पगारासाठी मनपा कर्मचाऱ्यांची वणवण; महिनाअखेरीसही वेतन थकीत, उशिरा होणाऱ्या पगारामुळे आर्थिक नियोजन कोलमडले…

---Advertisement---

 

जळगाव महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला वेळेवर पगार मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पगाराच्या नियमानुसार महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत वेतन जमा होणे अपेक्षित असताना, गेल्या काही महिन्यांपासून थेट २० तारखेनंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पगाराच्या या सततच्या विलंबामुळे मनपातील कर्मचाऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घरखर्च, किराणा, मुलांच्या शिक्षणाची फी, वैद्यकीय खर्च तसेच बँकांचे कर्जाचे हप्ते भरणे कठीण होत असल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

वेळेवर पगार न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांतून गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर वैयक्तिक कर्जांचे हप्ते वेळेत भरले जात नाहीत. त्यामुळे बँकांकडून दंड आकारला जात असून कर्मचाऱ्यांच्या ‘सिबिल स्कोअर’वरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मात्र सततच्या या लेटलतीफ कारभारामुळे कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक आर्थिक संतुलन बिघडले असून मानसिक ताणही वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचारी संघटना आणि प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कसाबसा चालू महिन्यात २३ मे रोजी पगार करण्यात आल्याचे समजते. मात्र, भविष्यात दरमहा १ ते ५ तारखेच्या आत नियमित वेतन देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---