---Advertisement---
पंढरपूर; राज्यातील शेतकरी, बेरोजगार युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस शनिवारी उत्साहात पार पडला. आंदोलनाला राज्यभरातील विविध पक्षांचे नेते, सामाजिक संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले.
आंदोलनस्थळी भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये आमदार निलेश लंके, खासदार शशिकांत शिंदे, आमदार राजू खरे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, किसान सभाचे अजित नवले यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शासनाने शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी, तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
केंद्रीय कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आंदोलनाची भूमिका जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून दोन वेळा चर्चा केली. आंदोलन मागे घेण्यासाठी चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, केवळ चर्चेपेक्षा शासनाने मागण्या मान्य करून त्याबाबत अधिकृत घोषणा करावी, अशी ठाम भूमिका आमदार पवार यांनी घेतल्याचे आंदोलनस्थळी सांगण्यात आले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रविवारी आंदोलनस्थळी भेट देणार असून, राज्यातील इतर नेत्यांच्याही भेटी अपेक्षित आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे-पाटील हे देखील आंदोलनस्थळी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग करणारे २६ आंदोलक देखील सामील झाले आहेत.
आंदोलन स्थळी दिवसातून तीन वेळा भोजन हरिपाठ आयोजन करण्यात येत आहे त्यामुळे पंढरपुरात अधिक महिन्याच्या शेवटी पंढरपुरात आंदोलन स्थळी व्यक्तिमेय वातावरण निर्माण झाले आहे.









