ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर १०० हून अधिक दिवस तुरुंगात काढावे लागले. या अनुभवावर आधारित आणि त्यावेळच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देणारे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या हस्ते या पुस्तकाचे रवींद्र नाट्य मंदिर येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जावेद अख्तर म्हणाले माझ्यासमोर नरक आणि पाकिस्तान हे दोन पर्याय राहिल्यास मी नरक निवडेल.
अख्तर पुढे बोलताना म्हणाले लोकशाहीत संसद, निवडणुका, नेते, वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आणि प्रामाणिक माध्यमांची गरज आहे. त्याचबरोबर कोणत्याही पक्षाची फिकीर न करता व्यक्त होणाऱ्या नागरिकांचीही आवश्यकता असते. मी त्यातलाच एक व्यक्ती आहे. तुम्ही एकाबाजूने बोलत असाल तर दुसऱ्या बाजूच्या लोकांना नाराज करता. पण तुम्ही सर्वच बाजूंनी बोलायला लागलात, तर अनेकांची नाराजी ओढवून घेता. माझ्याबाबत तसेच होते. मला दोन्हीकडून शिव्या देणारे आहेत. मला दोन्ही बाजूचे कट्टरपंथीय शिव्या घालतात. एका बाजूचे म्हणतात, ‘तू काफीर आहेस नरकात जाशील’. तर दुसऱ्या बाजूचे म्हणतात, ‘जिहादी तू पाकिस्तानला निघून जा’. आता जर माझ्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरकातच जाणे पसंत करेन.
३० वर्षात चार वेळा संरक्षण
जावेद अख्तर कट्टरपंथीयांच्या उपद्रवाची माहिती देताना म्हणाले की, मी १९ वर्षांचा असताना मुंबईत आलो होतो. आज जो काही आहे, तो मुंबईमुळेच. हे कर्ज मी सात जन्मात उतरवू शकत नाही. मागच्या ३० वर्षांत चार वेळा मला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे. त्यातील तीन वेळा मुल्लांनी दिलेल्या धमक्यामुळे संरक्षण दिले गेले.