---Advertisement---

चारचाकी वाहनतळ, ब्राह्मण संघाजवळील रेल्वे बोगद्याचे काम लवकर मार्गी लावा..!

---Advertisement---

मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

जळगाव : शहरातील शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी ब्राह्मण संघाच्या सभागृहाच्या समोर बोगदा प्रस्तावित आहे. याबाबत जळगाव महापालिका तसेच नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या बोगद्याचे काम सुरू करण्याची विनंती मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी केली.

मध्य रेल्वेतर्फे क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समितीची १२६वी बैठक गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे झाली. अध्यक्षस्थानी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा होते. यावेळी बैठकीत मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांच्यासह मध्य रेल्वेतील ४७ सदस्य उपस्थित होते. बैठकीत मध्य रेल्वे क्षेत्रातील विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले.

जळगाव रेल्वे स्थानकामध्ये विविध विकास कामे सुरू असून नवीन इमारत, सरकते जीने, प्लॅटफॉर्म, वाहनतळ आदी कामांचे प्रश्न यावेळी मांडण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी २०२५ पर्यंत काम पूर्ण होणार असल्याचे आश्वासन सल्लागार समिती सदस्य यांना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.

अमरावती-पुणे गाडी नियमित करण्याची मागणी

बैठकीत पुणे येथे जाण्यासाठी भुसावळ-जळगाववरून जाणाऱ्या रेल्वे गाड्या कमी असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी २२११८ अमरावती-पुणे ही साप्ताहिक गाडी नियमित करण्याची मागणी करण्यात आली. या विषयी रेल्वे बोर्डला विनंती केली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले. अमरावती-मुंबईच्या रेल्वे गाडीचे कमी केलेले स्लीपर कोच वाढविण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत पुन्हा सुरू करावी, या मागण्यांसह विविध मागण्या यावेळी बैठकीत करण्यात आल्या.

जळगाव रेल्वे स्थानक येथील रेल्वे पोलिस दलात पोलिस अधिकारी यांच्यासह आठ ते दहा पुरुष रेल्वे पोलिस कर्मचारी आहे. तर एकच महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे दोन ते तीन अजून महिला पोलिस कर्मचाऱ्यांची जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस दलाच्या स्टेशनमध्ये आवश्यकता आहे. त्यात जळगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस दलात केवळ एकच महिला कर्मचारी असल्याने जळगाव रेल्वे स्थानकावरील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याबाबत मुंबई येथे मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत जळगाव येथील सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडिया यांनी हा प्रश्न उपस्थित करून मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त सुरेंद्रनाथ चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे जळगाव रेल्वे स्थानकामध्ये महिला रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment