---Advertisement---

जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया’ अभियानास प्रारंभ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांची माहिती

---Advertisement---

जिल्ह्यात अतिसार आजाराचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘स्टॉप डायरिया अभियान-२०२५’ हे राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया अभियान-२०२५’अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. मोहिमेचा प्रारंभजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. अभियानांतर्गत जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षांतील ग्रामीण व शहरी भागातील एकूण एक लाख ८७ हजार ५६७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील एक हजार ५९० शाळा व अंगणवाड्यांमध्ये अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य, पाणीपुरवठा, माहिती, शिक्षण, महिला व बालकल्याण आदी विभागांच्या समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांमध्ये स्वच्छतेचे संदेश पोहोचवणे, ओआरएस झिंक टॅबलेटचे वितरण तसेच जनजागृती उपक्रम हाती घेणे यावर भर देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास विभाग तसेच ग्रामविकास विभाग, अशा सर्व शासकीय यंत्रणांच्या मदतीने अभियान राबविण्यात येत आहे. अभियान काळात प्रत्येक गावात, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व शाळांमध्ये विविध माध्यमांतून माहिती व जनजागृती केली जात आहे.

यात अतिसार झालेल्या शून्य ते पाच वर्षांच्या बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच आठ ते दहा मातांचा, घरांचा गट तयार करून त्यांना ओआरएसचे मिश्रण कसे तयार करावे व बाळाला ते कसे द्यावे याबद्दल माहिती देण्यात येत आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रतिबंध आणि व्यवस्थापनसाठी कार्य करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या पालकांचे योग्य समुपदेशन करण्यात येत आहे.

आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटीमध्ये ओआरएस व हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. अतिसारामध्ये ओआरएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वात प्रभावी उपचार पद्धती असून, अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्टॉप डायरिया अभियानात जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी सहभाग घेऊन ‘अतिसार थांबवा’ या अभियानाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी केले आहे.

अतिसार प्रतिबंधासाठी….

मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची स्वच्छता केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. पिण्याचे पाणी स्वच्छ, सुरक्षित व झाकून ठेवावे. नेहमी बालकाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौच करू नये.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---