जळगाव : निवडणुका लढणे आणि जिंकणे हा एकमेव कार्यक्रम हा राजकीय पक्षांचा नसतो. मुळातच शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं, काम करणं, सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा आहे. निवडणुका येतात आणि जातात मात्र आपण हातात घेतलेलं कार्य सोडायचं का ? असा प्रश्न खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते शनिवारी (३१ मे ) अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भाजपचे लोक हे कायम निवडणुकीच्या मूडमध्ये असतात. नरेंद्र मोदी यांना देशात काय चाललं आहे याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. सिंदूर यात्रा, रोड शो करत ते प्रत्येक राज्यात निघालेले आहेत. असं काम शिवसेना कधीही करणार नाही. आमाला लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री लोकांचे तोंड काळे करायला निघाले आहेत, जिल्ह्यात महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहेत, ॲम्बुलन्स मिळत नाही, उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून मिरवता, हे तुम्ही राज्याचं तोंड काळ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप खा. राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला.
लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार व ॲम्बुलन्स मिळत नाही यावर तुम्ही काहीच मत व्यक्त केले नाही. यासाठी संवेदनशीलता लागते ती यांच्याकडे नाही असे ते म्हणाले. लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूती होत आहेत त्यांना ॲम्बुलन्स मिळत नाही यावर कधी तुम्ही तुमचं मत व्यक्त केला आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारला आहे.