भडगाव : तालुक्यात खरीप हंगामासाठी 15 मे पासून बियाणे विक्री सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची देखील बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भडगाव शहरात व परिसरात कृषी विभागाकडून भरारी पथकाद्वारे अचानक कृषी केंद्रांच्या तपासणी करण्यात येत आहे.
तालुका कृषी अधिकारी डी. आर.तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकात कृषी अधिकारी ईश्वर देशमुख, मंडळ कृषी अधिकारी कजगाव, पी.एन.खाडे, भडगाव कृषी अधिकारी आर. बी. राठोड यांचा समावेश आहे. कृषी केंद्रांची तपासणी दरम्यान साठा नोंद वही अद्यावत नाही, परवाना दर्शनीस्थळी लावलेला नाही, साठा फलक अद्यावत नाही अशा किरकोळ स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्यामुळे संबंधितांना नोटीस देण्यात आलेल्या आहेत. तसेच गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्यास संबंधित बियाणे विक्री केंद्राचे परवाने निलंबनाची कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे पथकाचे अध्यक्ष डी .आर. तांबे यांनी सांगितले.
खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरात बियाणे उपलब्ध व्हावे, त्यांची फसवणूक होऊ नये याकरिता भरारी पथकाची करडी नजर आहे. कृषी केंद्रांना भेटी देऊन अचानक तपासणी करण्यात येत आहे. सर्व बियाणे विक्रेते यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार व वाजवी दरातच बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, मुदत बाह्य किंवा चढ्या दराने बियाण्याची विक्री करू नये. असे आढळून आल्यास संबंधित विक्री केंद्रावर बियाणे कायदा १९६६ नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे व खरेदीची पक्की पावती अथवा बिल प्राप्त करून घ्यावे. तसेच शेतकऱ्यांनी एमआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ नये. अनधिकृत किंवा खाजगी व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारचे बियाणे खरेदी करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच तण नाशकाला सहनशीलअसलेले एचटीबीटी हे प्रतिबंधित बियाणे खरेदी करू नये. अशा प्रकारचे बोगस बियाणे अनधिकृत वा खाजगी व्यक्ती द्वारे विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित कृषी विभागात तक्रार करण्यात यावी. तसेच चढ्या दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित कृषी विभागास संपर्क करून फसवणूक टाळावी तसेच बीजप्रक्रिया व उगवणक्षमता तपासूनच, ७५ ते १०० मीमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी असे आव्हान देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
एकाच वाणाची मागणी करू नये कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांकडून काही विशिष्ट वाणा चीच मागणी होत आहे. अशा वाणा च्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने तुटवडा हा भासत आहे, मात्र सर्व कंपन्यांच्या कपाशी वाणाचे जैवतंत्रज्ञान सारखेच असल्याने उत्पादन देखील सारखेच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील एकाच वाणाचा आग्रह न करता इतर वाणाची खरेदी केल्यास तुटवड्याची स्थिती जाणवणार नाही.
भडगाव तालुक्यासाठी 17,402 मे.टन खताचा पुरवठा होणार
भडगाव तालुक्यासाठी खरीप हंगाम 2025 मध्ये युरिया 4633 मे.टन,एस. एस. पी. 4065 मे.टन, एम.ओ.पी. 1807 मे टन, संयुक्त खते 5901 मे.टन,डीएपी 996 मे.टन असा एकूण खत साठा 17402, मे .टन प्राप्त होणार आहे. सदरचा पुरवठा होणारे खत तालुक्यासाठी पुरेसे असून टप्या टप्प्याने प्राप्त होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकते नुसारच खते खरेदी करावे असे आवाहन कृषी विभाग मार्फत करण्यात येत आहे. तसेच कपाशी पिकाखालील 23,200 हे. क्षेत्राची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने काढला असून त्यासाठी 1,15,700 पाकिटे तालुक्यासाठी उपलब्ध होणार असून खते व बियाणे ची कुठल्याही प्रकारची टंचाई भासणार नाही.