जळगाव : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी राज्यातील २७ महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल असे संकेत दिले आहेत. ते शनिवारी (३१ मे ) रोजी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान खा . राऊत यांनी काल शुक्रवारी (३० मे) रोजी जळगाव विमान तळावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, काय चर्चा झाली याबद्दल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, सुरेशदादा जैन यांच्यासोबत झालेली चर्चा सांगणे हे कोणाचेही सोयीचे नाही अशी भूमिका मांडली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांची मदत घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित केला असता, सुरेशदादा हे आता सक्रिय राजकारणात नाही. परंतु, त्यांचा जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. आजही त्यांचे राजकारणावर पगडा आहे. त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. ते अलीकडे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून येथे आल्यावर त्यांना भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे हा एक कर्तव्याचा भाग असल्याचा स्पष्ट केले.
विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे करु
महाविकास आघाडी आजही महाराष्ट्रात काम करत आहे. राज्यात होऊ घातलेल्या २७ महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेस, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष व शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊन लढलो तर विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे करु शकू.
शरद पवार व अजित पवार हे एकत्र येणार का ? असा प्रश्न विचारला असता खासदार राऊत म्हणाले की, ह्या चर्चा हवेत असून शरद पवार यांची फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे. त्यांच्याकडे शंकरराव चव्हाण यांचा वारसा आहे. ते धर्मांध आणि जातीय शक्तींकडे जातील असे त्यांच्या सहकाऱ्यांना, समर्थकांना आमच्या सारख्या राजकारण्यांना वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.