मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
अजित पवार हे कठोर आर्थिक शिस्तीचे प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात.
विकासयोजनांना निधी उपलब्ध करून देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोरोनाच्या काळातही अजित पवार यांनी राज्याची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती. त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.
शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित. आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. २०२१ चा अर्थसंकल्प महिला शक् तीला तर २०२२ चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना समर्पित होता.
विक्रमाच्या वाटेवर
अजित पवार थोड्याच वेळात अकरावा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा, अजित पवार यांनी उद्याचा अर्थसंकल्प धरून ११ वेळा, त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) यांना जातो.