---Advertisement---
42 हजार 560 रुपयांचे वीज बिल थकीत; महावितरणची कारवाई
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे तब्बल 42 हजार 560 रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल 2024 पासून तलाठी कार्यालयाचे वीज बिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही थकीत रक्कम भरली गेली नसल्याने महावितरणच्या वतीने अखेर वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली.
वीजपुरवठा बंद झाल्यामुळे तलाठी कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर थेट परिणाम झाला असून नागरिकांची अनेक महत्त्वाची कामे ठप्प झाली आहेत. विविध दाखले, नोंदी आणि इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कार्यालयात वीज नसल्याने संगणकीय कामकाजही बंद पडले असून नागरिकांची पायपीट वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे
.
दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.









