---Advertisement---
जळगाव : शहरातील खिसे कापू टोळीतील तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (२५ जून) रोजी अटक केली आहे. हे तिघे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, एक कार तसेच पाच मोबाईल असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागाने गुरुवारी (२६ जून) रोजी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
नवीन बसस्थानकात गर्दीचा गैर फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापून पैसे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या.
जळगाव बसस्थानक परिसर अमरावतील येथील काही रेकॉर्डवरील गुन्हेगार हे खिसे कापणारे गुन्हेगार असल्याची गोपनिय माहिती एलसीबी पथकातील पो.कॉ. प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आणि रविंद्र कापडणे यांनी बुधवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. चौकशीत हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती),अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपुरा, अमरावती) आणि अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजिद समोर, अमरावती) अशी नावे असल्याचे सांगितले. तिघांनी बसस्थानक चोरी केल्या कबुली दिली.
आरोपींच्या अंगझडती व वाहनाची तपासणी केली असता, पोलिसांना त्यांच्याकडून ३३ हजार ८३० रूपयांची रोकड, १७ हजार ५०० किंतीचे पाच मोबाईल, एक रेक्झीन बॅग आणि ५ लाख रुपये किंमतीची इंडीका कार असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.