---Advertisement---

तांबेपुरा-सानेनगर रेल्वे बोगद्यावर वाहतूक मनाईचा फलक; नागरिकांत चिंता

---Advertisement---

अमळनेर : शहरातील तांबेपुरा-सानेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यावर रेल्वे प्रशासनाने नुकताच ‘या पुलातून वाहन चालवण्यास मनाई आहे’ असा फलक लावल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. या फलकामुळे हा रस्ता भविष्यात वाहतुकीसाठी बंद केला जाणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मागील अनेक वर्षांपासून या मार्गाचा उपयोग तांबेपुरा, सानेनगर, अंतुर्ली, रंजाणे, तासखेडा, नंदगाव, लडगाव, अंबारे, खापरखेडा, करणखेडा, मुडी प्र. अमळनेर या गावांतील नागरिक शहरात ये-जा करण्यासाठी करतात. विशेषतः विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी हा बोगदा महत्त्वाचा आहे. हा बोगदा कागदोपत्री नाल्यासाठी असला तरी प्रत्यक्षात त्यातून वर्षानुवर्षे वाहतूक सुरू आहे.

---Advertisement---

काही दिवसांपूर्वी मोठ्या वाहनांसाठी या मार्गावर बंदी घालण्यात आली होती. सध्या लहान वाहनांना या मार्गाने जाण्याची परवानगी आहे. मात्र आता रेल्वे प्रशासनाने ‘वॉटर वे ब्रिज – नो ट्रेस पासिंग’ असा फलक लावल्याने बोगद्यातून कुठल्याही वाहनांना जाण्यास बंदी घातली जाईल, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार असून, प्रताप कॉलेजमार्गे येणाऱ्या वाहनांना मोठा फेरा घ्यावा लागतो. शिवाय, गायत्री नगर भागातील रस्ता सध्या अत्यंत खराब स्थितीत असून चिखल व खड्ड्यांमुळे वाहतूक अडचणीत आली आहे. येथील काँक्रीट रस्त्याचे काम मंजूर झाले असले तरी ते पूर्ण होण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर, बोगदा वाहतुकीस बंद केल्यास आपत्कालीन सेवा, विशेषतः अग्निशमन दल वेळेत पोहचू शकणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे किमान लहान वाहनांसाठी तरी बोगदा खुला ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---