---Advertisement---
जळगाव : खान्देशातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता अधिक चांगल्या प्रकारची असल्याने हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे याकरीता सरकारचे क्रीडा विज्ञान-तंत्रज्ञानाचे केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ‘जिमखाना डे’ या कार्यक्रमात केंद्रीय राज्य व युवक कल्याण क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य ॲङ. अमोल पाटील, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. म.सु. पगारे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य डॉ. एस.टी. पाटील, डॉ. आय.डी. पाटील, स्वप्नाली काळे (महाजन), क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना मंत्री खडसे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून घरघरात खेळ पोहचविण्यासाठी योजना तयार केली आहे. या योजनेचा लाभ विस्तारीत व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली. खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागून मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते असेही त्या म्हणाल्या.
---Advertisement---
व्यवस्थापन परिषद सदस्य व जिमखाना समितीचे अध्यक्ष ॲङ. अमोल पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थी खेळाडूंचा खेळतांना अपघात झाल्यास त्याकरीता मदतीची व्यवस्था होण्याकरीता विद्यापीठ खेळाडू अपघात विमा योजना सुरु करण्याची आखणी करीत आहे. स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची कार्यवाही सुरु केली आहे की ज्यायोगे खेळाडूं विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल.
अध्यक्षीय भाषणांत कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यापीठाने दोन कोटी रूपयांची तरतूद क्रीडा विभागासाठी केली आहे. खेळाडूंनी केवळविद्यापीठ स्पर्धांपूरता मर्यादित न राहता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे पोहचता येईल यासाठी प्रयत्न करावे. त्या करीता शारिरीक व मानसिक तंदुरूस्ती, सातत्य, सराव व क्षमता विकसित करणे त्याकरीता क्रीडा, विज्ञान व तंत्रज्ञान अवलंब केला पाहिजे असे आवाहन करीत जे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये सहभागी होतील त्यांना विद्यापिठा कडून मदत केली जाईल असे आश्वस्त केले.