जळगाव : जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. काही ठिकाणी या बेमोसमी मान्सूनपूर्व पावसामुळे निसर्गाला नवसंजीवनी मिळाली असून शेतमशागतीच्या कामांना वेग आला आहे. तर दुसरीकडे या पाण्यामुळे काही ठिकाणी आरोग्य समस्या उद्भवत असून ४१ गावांमधील पिण्यायोग्य पाण्याचे जलस्रोत दूषित असल्याने पेयजलापासून होणाऱ्या आजारांचे सावट उद्भवले आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागात घरघर जल योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. काही ठिकाणी योजना पूर्ण होऊन जलवाहिन्यांच्या जोडणीची कामे प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी उद्घाटन मुहूर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची जिल्हा प्रशासन पातळीवरून मान्सूनपूर्वी जलस्रोतांची पडताळणी व तपासणी केली जाते. यात जलस्रोतांमधील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही यासंदर्भात अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केले जातात.
दूषित पाणीपुरवठ्याचे संकट असे असले तरी, जळगाव जिल्ह्यातील ४१ गावांसमोर पेयजल अयोग्य असल्याने मोठे आरोग्य संकट उभे राहिले आहे. या गावांमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या गावांमध्ये मान्सूनदरम्यान नागरिकांना कोणत्या पेयजलाचा पुरवठा होईल, असा गंभीर प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

पाच तालुक्यांतील जलस्रोत उत्तम
जिल्हा परिषदेकडून गावांमधील उपलब्ध असलेल्या पेयजल स्रोतांची तपासणी करून, पाण्याचे स्रोत हे पिण्यायोग्य आहेत की नाही, याबाबतची पडताळणी एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून करण्यात आली. यात जिल्ह्यातील १ हजार १५७ गावांमधील जलस्रोत तपासणीदरम्यान चांगल्या प्रतीचे आढळून आले आहेत. यात अमळनेर पारोळा, चोपडा, बोदवड आणि जामनेर तालुक्यात बऱ्याच ठिकाणचे जलस्त्रोतांमधील पाणी पिण्यायोग्य असल्याचे जिल्हा परिषदेच्या जलस्त्रोत परिक्षण सर्वेक्षणात समोर आले आहे.
४१ गावांमध्ये पेयजलस्रोत दूषित
तपासणीदरम्यान दूषित जलस्त्रोत आढळून आलेल्या ४१ गावांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून पिवळे कार्ड देण्यात आले आहे, यात भडगाव तालुक्यातील वडगाव, बाळद खुर्द, महिंदळे, वडगाव नालबंदी, बांबरूड प्र. बहाळ, भुसावळ तालुका दर्यापूर, चाळीसगाव तालुक्यात दसेगाव, वडगाव लांबे, पाटणा, धरणगाव तालुक्यात बांभोरी प्र., कवठळ, चमगाव आणि सतखेडा, एरंडोल कासोदा, फरकांडे, आनंदनगर, जळगाव तालुक्यात आव्हाणे, आसोदा, वडनगरी, नंदगाव, डिकसाई, घार्डी, विदगाव, धामणगाव, शेळगाव, भोकर, रावेर तालुका गहूखेडा, रायपूर, रणगाव, सुदगाव, तासखेडा, वाघोदा बुद्रुक, निभोरा, तुमखेडा, यावल तालुका कासवा, दुसखेडा, पाचोरा तालुका वरसाडे, मुक्ताईनगर तालुक्यात पंचाणे, हलखेडा, जोधनखेडा, हिवरा या गावांमधील जलस्त्रोत पाणीपुरवठा पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात दिसून आले आहे.
पावसाळ्यात आजार बळावण्याची शक्यता
ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठमोठे खतांचे खड्डे, नाले गटारांमधून नदी वा नाले प्रवाहातून वाहून जाणारे पाणी आदी कारणांमुळे दुषित पाणी विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्त्रोतांमध्ये मिसळण्याची शक्यता वाढते. यामुळे कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ असे अन्य आजार दूषीत पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता दिसून येते.
जिल्ह्यात सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा आहे. टैंकरव्दारे होणारा पाणीपुरवठा पाणीपुरवठ्याच्या विहिरीत सोडला जातो व ते पाणी जलकुंभाव्दारे पुरविले जाते. यात जलशुद्धीकरणासाठी तसेच पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये क्लोरिन मिश्रण व जल शुद्धीकरणाचे उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यात दूषित पाण्याम ळे होणारे आजार रोखण्यासह नियंत्रणासाठी आरोग्य विभागाला सूचना तसेच टिसीएल पावडर वा निर्जंतूकीकरणासंदर्भात आवश्यक साहित्याचा पुरवठा देण्यात आला आहे. याशिवाय उपाययोजनांची देखील अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव.