धरणगाव : शहरातील एका तरुण शेतकऱ्याने धरणगाव शिवारातील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गिरीश सुकदेव माळी (वय ३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गिरीश माळी आपल्या परिवारासह धरणगावात राहत होता. त्याच्या परिवारात हा पत्नी कविताबाई, आई आशाबाई, वडील सुकदेव दयाराम माळी आणि दोन मुले मयुरेश, कार्तिकी यांचा समावेश आहे. तो आणि त्याचा मोठा भाऊ स्वप्नील माळी हे दोघेही वडिलांच्या नावावरील धरणगाव शिवारातील शेतीत एकत्र काम करुन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.

मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास गिरीश आणि त्याचा भाऊ स्वप्नील हे धरणगाव शिवारातील पाटाजवळील शेतात भेंडी तोडायला गेले होते. दुपारी भेंडी तोडत असताना गिरीशने स्वप्नीलला ‘मी पाणी पिऊन येतो’, असे सांगितले आणि तो विहिरीकडे गेला. गिरीशला बोलविण्यासाठी स्वप्नीलने विहिरीकडे जाऊन पाहिले.
यावेळी गिरीश हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गिरीश माळी याला तपासत मृत घोषित केले. या घनतेबाबत धरणगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.