---Advertisement---
पाचोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगमध्ये (राज्यसेवा मुख्य परीक्षा) उर्दू साहित्याचा वैकल्पिक विषय ( OPTIONAL SUBJECT) म्हणून समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी पाचोरा लिटररी सोसायटीतर्फे प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वर्षे २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केलेला असून वर्ष 2025 पासून संघ लोक सेवा आयोग (UPSC) प्रमाणेच MPSC ने ही मुख्य परीक्षेत विषयांची रचना केलेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र लोक सेवा आयोग (राज्य सेवा) मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होत होती. परंतु, 2025 पासून या पद्धतीमध्ये बदल होणार असल्याने मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे.
संघ लोक सेवा आयोगप्रमाणेच, महाराष्ट्र लोक सेवा आयोग मुख्य परीक्षेत सामान्य ज्ञान १,सामान्य ज्ञान २,सामान्य ज्ञान ३,सामान्य ज्ञान ४, निबंध, अर्हता विषय, वैकल्पिक विषय या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. वैकल्पिक विषयात राज्य सेवा आयोगाने 25 विषयांचा समावेश केलेला आहे. यामध्ये मराठी साहित्य सोबत विज्ञान व मानवशास्त्र हे विषय आहेत.
महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास महाराष्ट्र मध्ये 2011 च्या जनगणने प्रमाणे सुमारे 11.54 टक्के मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाजामध्ये बहुसंख्य लोकांची मातृभाषा ही उर्दू आहे. मुले पहिली पासून उर्दू भाषा बोलतात व शिकतात. जर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उर्दू साहित्याच्या समाविष्ट केल्यास उर्दू माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना वैकल्पिक विषयाची निवड व तयारी करणे सोपे जाईल. संघ लोकसेवा आयोगामध्ये महाराष्ट्रातून यशस्वी होणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा विचार केल्यास देशात UPSC मध्ये उर्दू साहित्य घेऊन उत्तीर्ण होणारे सर्वात जास्त उमेदवार हे महाराष्ट्र राज्यातून आहेत.
शकील अन्सारी, न्यूह सिद्दिकी, सलमान पटेल, असीम खान, आदिबा अनम हे सर्व अधिकारी उर्दू साहित्य घेऊन उत्तीर्ण होणारे उमेदवार होते.
मालेगाव शहरातून राहणारे कैसर अब्दुल हक यांनी UPSC 2007 मध्ये मुख्य परीक्षा पेपर पूर्णपणे उर्दू भाषेत लिहून देशात 32 वी रँक प्राप्त केलेला होता.संघ लोकसेवा आयोग मध्ये उमेदवारांना यशस्वी बनवण्यामध्ये उर्दू साहित्याच्या मोलाचा वाटा आहे.
जर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्य सेवा) परीक्षेच्या नवीन पध्दतीत उर्दू साहित्य विषयाला एक वैकल्पिक विषय म्हणून समाविष्ट करण्यात आला तर,जास्तीत जास्त अल्पसंख्यांक मुस्लिम विद्यार्थी प्रशासकीय सेवेचा भाग बनतील, व देश व राज्याच्या धोरण निर्मितीमध्ये आपले योगदान देतील असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाची प्रत आमदार किशोर पाटील यांना देखील देण्यात आली असून आमदार पाटील यांनी निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मार्फत निवेदन सादर केले आहे. प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन सादर करताना पाचोरा लिटररी सोसायटीचे महिला सदस्य संजिदा शेख, जावेद रहीम, इसराईल खान,सलमान शौकत, मुआज शेख, नासिर शेख, एडवोकेट वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.