---Advertisement---
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसराला रविवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पहाटे तीन ते पाच वाजेदरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक केळी बागा अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यात अनेक ठिकाणी मोठी झाडेही उन्मळून पडली. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला असून काढणीच्या टप्प्यात असलेल्या बागांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. आधीच उत्पादन खर्चात झालेली वाढ, शेतीमालाला मिळणारे कमी दर आणि वारंवार उद्भवणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
सततच्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी अंतुर्ली परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.









