---Advertisement---
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांमधील गोंधळ, बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रमांवरील पूर्वसूचना न देताच अचानक वाढवलेले शैक्षणिक शुल्क व परीक्षा विभागाचा गोंधळ या मुद्द्यांवर बुधवारी युवासेनेच्या पदाधिकारी यांनी कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी कुलगुरू यांनी फी वाढीबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन युवासैनिकांना दिले.
युवासेने दिलेल्या निवेदनानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण वर्षभर जुनी फी रचना लागू ठेवून शैक्षणिक वर्ष संपण्याच्या टप्प्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यापीठ प्रशासनाने अचानकपणे ३० ते ३५ हजारांपर्यंत शुल्क वाढवले आहे. परीक्षेला हजर असतानाही अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे. विद्यापीठाने तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक दिले असले तरी अनेक वेळा हे क्रमांक बंद असतात. विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण होत नाहीत. कुलगुरू यांना निवेदन देतांना युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, विस्तारक कुणाल कानकाटे, महानगरयुवाधिकारी सिद्धार्थ करनकाळ, मनोज जाधव, युवासेने कॉलेज कक्षाचे प्रीतम शिंदे, आयुष्य कस्तुरे, यश लोढा, अजय खैरनार उपस्थित होते.
---Advertisement---
युवासेनेच्या अशा आहेत मागण्या :
विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे निकाल लागत असताना त्यांना परीक्षेस उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवले आहे. असे चुकीचे निकाल लागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी मागवून त्यावर तक्रार मिळाल्यानंतर दोन दिवसाच्या आत सुधारित निकाल लावावा.
बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५चे शुल्क विद्यापीठ प्रशासनाने पूर्वसूचना न करता शैक्षणिक वर्ष संपत असताना अचानक वाढवले आहे. शुल्क शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ठरल्याप्रमाणेच आकारावे. वर्ष २०२५-२६ साठीचे हे शैक्षणिक शुल्क नियमानुसार १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवू नये.
अनुपस्थित निकाल लावण्यास जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. फोटोकॉपीची मागणी केल्यानंतर विशिष्ट कालमर्यादेतच फोटोकॉपी देण्याची व्यवस्था करावी तसेच पुनर्मूल्यांकनाची मागणी केल्यानंतर विशिष्ट काल मर्यादतच पुनर्मूल्यांकनाचा निकाल लावावा.
विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे योग्य पद्धतीने न-तपासल्यामुळे व्यवस्थित पेपर लिहूनही अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आलेले आहे. याच प्रकारच्या तक्रारी मागील वर्षीही आढळल्या होत्या, या विषयात आपणास यापूर्वीही युवासेनेने सूचित केले होते; परंतु त्यावर उपाययोजना केलेली नाही.
विद्यापीठाने विविध तक्रारी निवारण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर दिलेले आहेत; परंतु अनेकदा हेल्पलाइन नंबर चालू राहत नाही. तसेच वेळोवेळी तक्रार करूनही कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही.