---Advertisement---
जळगाव : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवार (८ जुलै) पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तर २ कर्मचाऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ केला असून ते न्याय मिळेपर्यंत कायम उपोषणाला बसणार आहेत.
मुख्य कार्यालयाच्या परिपत्रकानुसार १५% बदल्या करण्याचे आदेश असताना आणि बदल्यांसाठीची टक्केवारी शिल्लक असतानाही कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या नसल्यामुळे कामगारांना अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या उपोषणाला कामगार संघटनेने पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, हे आंदोलन संघटनेच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे स्पष्ट केले आहे. संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कामगारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही, तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.
---Advertisement---
या आंदोलनामुळे औद्योगिक शांतता भंग झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. कामगारांच्या हक्कासाठी आणि प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचे कामगार महासंघाने म्हटले आहे. मंगळवारी वरिष्ठ तंत्रज्ञ विकी पाटील, तंत्रज्ञ सुदर्शन सपकाळे यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला महासंघाने साखळी उपोषणद्वारे पाठिंबा दिला असून सहभागी झाले आहेत. संघटनेचे सर्व सभासद सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने येणाऱ्या काळात आंदोलन आणखी तीव्र करण्याचा महासंघाच्या वतीने इशारा देण्यात आलेला आहे.