---Advertisement---
जळगाव : आनंद व उत्साहाचे पर्व असलेल्या दिवाळीत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र, हे करताना वीज सुरक्षेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीज यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या वीज उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता दिवाळी साजरी करावी, असे आवाहन ‘महावितरण’तर्फे करण्यात आले आहे.
दिवाळी साजरी करताना घरगुती वीज उपकरणांपासून सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी विजेच्या दिव्यांची माळ चांगल्या दर्जाची घ्यावी. वीजदिव्यांच्या माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सुलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी.
घरगुती उपकरणांसह वीज दिव्यांच्या माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. वीज सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाशकंदील किंवा दिव्यांच्या माळेसाठी श्री पीनचा वापर न करता वायर थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते.
गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विजेच्या दिव्यांची व आकाशकंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी. तुटलेली किंवा सेलो टेपने जोडलेली नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.
अन् ‘महावितरण’च्या कॉल सेंटरशी संपर्क साधा
वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीज यंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा तेथे कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीज यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास ‘महावितरण’च्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.