---Advertisement---
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया येथे गेल्या वर्षी उघडकीस आलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित एक अत्यंत दु:खद आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. या विषारी कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या चार वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बैतुल जिल्ह्यातील आमला तहसीलमधील टिकाबरी गावातील रहिवासी गोकुळ यादव यांचा मुलगा हर्ष हा गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ मृत्यूशी झुंज देत होता. 26 सप्टेंबर रोजी त्याला नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले होते. विषारी कफ सिरपमुळे त्याचे महत्त्वाचे अवयव निकामी झाले होते आणि तो कोमात होता.
डॉक्टरांनी हर्षचे प्राण वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तब्बल 128 दिवस उपचार सुरू होते, मात्र त्याची प्रकृती सुधारण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. अखेर रविवारी 1 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा हर्षने अखेरचा श्वास घेतला.
हर्षच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. “आम्ही शेवटपर्यंत आशा सोडली नव्हती, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला,” अशी हळहळ व्यक्त करताना हर्षचे आई-वडील अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. त्याच्या गावात शोककळा पसरली आहे.
सोमवारी नागपूरमध्ये शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हर्षचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबतची माहिती बैतुलचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. मनोज हुरमाडे यांनी दिली आहे.
हर्षच्या मृत्यूनंतर कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पीडित कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत म्हटलं आहे की, जर वेळीच कठोर कारवाई झाली असती आणि औषधांची योग्य तपासणी झाली असती, तर एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला नसता.
विशेष म्हणजे, छिंदवाडा जिल्ह्यात कफ सिरप पिल्यामुळे किमान 14 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तपासादरम्यान या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा अत्यंत विषारी घटक आढळून आला होता.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे









